जळगाव : प्रतिनिधी
शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगात कार चालवून तब्बल ८ ते ९ जणांना जोरदार धडक दिल्याची घटना ३ जून रोजी, सायंकाळी ७.३० वाजता घडली. या अपघातात दोन दाम्पत्य आणि एक तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातानंतर संतप्त जमावाच्या भीतीने या अल्पवयीन चालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून घटनास्थळावरून धूम ठोकली. बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर रस्त्यावर नेहमीप्रमाणे नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ होती. याच वेळी एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रामानंदनगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने भरधाव वेगात एमएच १५ एफटी ७२०१ क्रमाकांची कार चालवत येत होता. रामानंदनगर परिसरातील चर्चजवळ आल्यावर त्याचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. अनियंत्रित झालेली ही कार थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर घुसली आणि त्याने तब्बल आठ ते नऊ जणांना अक्षरश उडवले.
या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या धडकेत दोन दाम्पत्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तसेच एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य तीन-चार जण किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जमाव गोळा होऊ लागला. ‘पब्लिकचा मार बसेल’ या भीतीने घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने कार तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी तत्परता दाखवली. त्यांनी अजिबात वेळ न दवडता सर्व जखमींना तातडीने रिक्षा आणि इतर उपलब्ध वाहनांतून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी सर्व जखमींना रुग्णालयात हलवले होते. या प्रकरणी पोलिस आता पुढील तपास करत असून पसार झालेल्या अल्पवयीन चालकाचा शोध घेतला जात आहे



