
जळगाव : प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या गौरव हरीशचंद्र देशमुख (२८, रा. गणेश कॉलनी) या अभियंता तरुणाने रेल्वेसमोर आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभियंता असलेला गौरव देशमुख हा बांधकाम मक्तेदारीचे काम करायचा. गुरुवारीदेखील तो कामाच्या ठिकाणी होता. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ जाऊन त्याने रेल्वेसमोर झोकून दिले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस चौकीचे पोहेकॉ. किरण बारी, गणेश राजपूत हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी तरुणाचा तुटलेला मोबाईल आढळला. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी त्यातील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून संपर्क साधला. त्या वेळी कुटुंबाला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्या वेळी तरुणाची ओळख पटली. गौरव देशमुख हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हरिशचंद्र देशमुख हेदेखील अभियंता आहे. दोघांचे शहरात कामे सुरू आहेत. घरात सर्व परिस्थिती चांगली असताना त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकले नाही.
गौरव देशमुख या तरुणाचे १६ ऑगस्ट रोजी लग्न झाले. घटनेच्या आदल्या दिवशी गौरव याने पत्नी व कुटुंबीयांसोबत लग्नाचा अल्बम पाहिला. तसेच गुरुवारी रात्री तो गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन तरुणांसोबत नाचलादेखील होता. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. बजरंग बोगद्याजवळ तरुणाची दुचाकी आढळून आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



