विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र – : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी आज माहिती दिली.
महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार या अभियानाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला दि. २२, २५ व २६ जुलै २०२६ या तीन दिवसांपैकी एका दिवशी शिबीर आयोजित करण्याचे नियोजित होते. मात्र, दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने राज्यातील नागरिक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत.
त्यानुसार आता दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिबीर आयोजित करता येणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिबिरासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच हजार कुटुंबांना, तर संपूर्ण महाराष्ट्रात दहा लाख कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
*नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवांचा लाभ*
समाधान शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या सेवांचा लाभ विनाविलंब दिला जाणार आहे. राज्यातील महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाण जागेचे वाटप व नागरिकांना स्वामित्व सनद देणे, ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच महसूल विभागामार्फत ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
निवासी व व्यावसायिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी ‘विशेष अभय योजना-२०२५’ला मुदतवाढ देणे आणि शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटपपत्रावरील नोंदणी फी पूर्णपणे माफ करण्यावरही भर दिला जाणार आहे. कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती, ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ तसेच समाजातील वंचित व अनाथ घटकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
*जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी*
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जिल्हा परिषद आणि लीड बँक या प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना पात्र लाभार्थ्यांची तालुकानिहाय व योजनानिहाय माहिती सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी स्वतः या शिबिरांना उपस्थित राहून ‘सेवा सप्ताह’ म्हणून अभियानाचे नियंत्रण करणार आहेत. अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, कलाकार, साहित्यिक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना सक्रिय सहभागी करून घेतले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी व पात्र लाभार्थ्यांनी दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा’ लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
*************



