विजय पाटील :जळगाव महानगरपालिकेच्या वतीने ओला व सुका कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, या उद्देशाने नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी स्वखर्चाने कचरा संकलनाची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती देताना वैशाली पाटील यांनी सांगितले की, स्वच्छता कामगारांच्या न्याय्य मागण्यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असून, त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्यांना वेतन व मोबदला वेळेवर मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने तसेच संबंधित बीव्हीजी कंपनीने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मात्र, या वादाचा फटका प्रभागातील नागरिकांना बसू नये, यासाठी स्वतःच्या खर्चाने कचरा संकलनाची व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कचरा संकलनासाठी आवश्यक वाहने, चालक, मजूर आणि इतर यंत्रणेची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, शुक्रवार, दि. १७ जुलैपासून प्रभाग क्रमांक १३ मध्ये नियमितपणे कचरा संकलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुरुवारचा एक दिवस नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा, कचरा रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
“प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ न देणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. कोणतीही परिस्थिती असो, प्रभाग क्रमांक १३ च्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” असे नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी सांगितले.
“स्वच्छ प्रभाग – निरोगी प्रभाग” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



