विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज :जळगाव महानगरपालिकेच्या वतीने ओला व सुका कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पगाराच्या प्रश्नावर कामबंद आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना स्वच्छतेचा कोणताही त्रास होऊ नये आणि परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, या उद्देशाने शुक्रवार, १७ जुलैपासून प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपात कचरा संकलनाची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनाही पाठिंबा दर्शवत, “कामगारांना वेळेवर पगार मिळालाच पाहिजे, ही माझीदेखील भूमिका आहे. मात्र आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मी स्वखर्चाने कचरा संकलनाची व्यवस्था उपलब्ध करून देत आहे,” असे सांगितले.
नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना पुढील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच द्यावा.
कचरा रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
ही सेवा नागरिकांच्या हितासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वखर्चाने सुरू ठेवण्यात येत आहे.
“स्वच्छ प्रभाग, निरोगी प्रभाग” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केले आहे.



