सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरमधील माळशिरसमधील एका शेतात असलेल्या विहिरीत एक पिकअप टेम्पो कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यातून ८ जणांचे मृतदेह विहिरीत बाहेर काढण्यात आली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार टेम्पोमधील सर्वजण देवदर्शनाला गेले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. हे सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे होते. दरम्यान क्रेनद्वारे विहिरीतून पिकअप टेम्पो बाहेर काढली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मदतीसाठी अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली होती. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होते. माहिती कळतच आमदार उत्तम जानकर हे घटनास्थळाकडे निघाले. या अपघाताबाबत माहिती देताना उत्तम जानकर यांनी सांगितलं की, हा अपघात माझ्या तालुक्यात घडला आहे.
तांदुळवाडीतील एका शेतात एक मोकळी विहीर आहे, त्यात पिकअप वाहन कोसळली. माजी आमदार राम सातपुते म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. अपघात घडला तेथे एक विहीर होती. वाहनाला काही अडथळा नव्हता. पण पिकअप टेम्पो त्यात विहिरीत कोसळले. कारण विहिरीला कोणताच कठडा नव्हता किंवा संरक्षण भिंत नव्हती. या घटनेतील मृतांमध्ये 4 लहान मुलांचा आणि 4 महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत 2 जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विहिरीभोवती लोकांनी गर्दी केली होती, सर्वजण मदतकार्यात व्यस्त झाले होते. दरम्यान, या घटनेवर बोलताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एक कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातील उघड्या विहिरींचा प्रश्न उद्भवला होता. आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रस्त्याच्याकडेला असलेल्या भल्यामोठ्या विहिरीत पिकअप टेम्पो कोसळल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावामधील दरगुडे कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला होता. इंदोरे गावचे रहिवासी सुनील दरगुडे आणि त्यांचे कुटुंबीय एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत होते. मात्र, वाटेत अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याशेजारील खोल विहिरीत कोसळले.
मृत सर्व भाविक पंढरपूरच्या रांजणीचे
टेम्पो मधील हे सर्व भाविक रांजणी गावचे होते. म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले होते. देवाचे दर्शन घेऊन गावी परत विहिरीत त्यांचे पिकअप टेम्पो विहिरीत कोसळले. माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक असलेल्या एका शेतात विहिरीत पिकअप टेम्पो कोसळला. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या विहिरीत पिकअप टेम्पो कोसळला त्याला कोणताच प्रकारचा कठडा नव्हता.



