धरणगाव : ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू नागरिकांना योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने धरणगाव येथे अनुलोम संस्था आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मोतीबिंदूसह विविध डोळ्यांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असून, ‘कांताई नेत्र संजीवनी योजना’ अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
तपासणीदरम्यान काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात रेफर करण्यात आले.
या शिबिरात धरणगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपत कृपा ॲक्वाचे संचालक भिमराज पाटील आणि मनिषा पाटील यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनुलोममित्र अभय मराठे, राजेंद्र पाटील आणि विकास पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रचार केला. यावेळी संस्थेचे प्रतिनिधी प्रवीण दांडगे, नयना पाटील, ऋषिकेश बारी, निकिता चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



