मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या प्रवासात वाढ होणार असून, तिकीटावर प्रति प्रवास 2 रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’ आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ व दर्जेदार सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कायापालटाचा आराखडा जाहीर केला. गेल्या काही वर्षांत बसस्थानकांवरील अस्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने स्वच्छता सुधारण्यासाठी हा अधिभार लागू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जमा होणारा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार असून, त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे.
या नव्या योजनेअंतर्गत 1 जूनपासून सर्व एसटी स्थानकांवरील शौचालये प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध केली जाणार आहेत. तसेच प्रत्येक बसस्थानकाची दर चार तासांनी स्वच्छता केली जाणार असून, बस सेवा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक बस स्वच्छ असल्याची खात्री केली जाणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर वाचनालय उभारण्याची योजना असून, चालक व वाहकांसाठी विश्रांतीगृहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हे सर्व बदल 1 जूनपासून लागू होणार असून, या निर्णयामुळे प्रवास अधिक स्वच्छ आणि सोयीस्कर होईल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.



