धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गोंदेगाव ते रोटवद दरम्यान रस्त्याच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजता घडली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रोटवद येथील देवकाबाई शिवाजी मराठे (वय ५५) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी शिवाजी मराठे हे आपली आई देवकाबाई मराठे यांच्यासोबत २० फेब्रुवारी रोजी नातेवाईकांकडे चिंचपुरा गावाला गेले होते. तेथील काम आटोपून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात देवकाबाई मराठे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर काम सुरू करताना कोणत्याही प्रकारचा सूचना फलक लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रोटवद येथील ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे पाईप टाकलेले असताना त्यावर केवळ माती टाकली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने अपघात होत आहे, असा ही आरोप नागरिकांनी केला आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.