जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे व सभा घेत आहे. याच दरम्यान त्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपली असून देखील सरकारने निर्णय घेतला नसल्याने आता विरोधी आमदारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ.एकनाथ खडसे यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आ.खडसे म्हणाले कि, मनोज जरांगे जेव्हा पहिल्यांदा आमरण उपोषणाला बसले होते. तेव्हा संकट मोचक म्हणून गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा ओबीसीमधून आरक्षण देऊ असे त्यांनी लिहून दिल्याचे जरांगे पाटील सांगत होते. आता सरकार त्या शब्दापासून मागे फिरत आहे. आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असे सरकार म्हणत आहे. त्यामुळे सरकारच्या बोलण्यात विसंगती असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
आता मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण देऊ असे सरकार म्हणत आहे म्हणजे मराठा समाजाला मुर्ख बनविण्याचे काम सरकार करीत आहे. जो निर्णय महिनाभराने घेणार आहे तो निर्णय आताही घेऊ शकते. मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रात बाका प्रसंग उद्भवू शकेल असेही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. राम मंदिराच्या उभारणीत योगदान नसणारे देखील आता श्रेय घेत आहेत. कारसेवेत आम्हाला ललितपूर जेलमध्ये ठेवले होते. आमच्यावर लाठीमार झाला. राम लल्ला, ‘हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे’, अशा घोषणा देत होते. ललितपूर जेलमध्ये गिरीश महाजन माझ्यासोबत नव्हते ते कोणत्या जेलमध्ये होते हे त्यांनी सांगावे. ज्याचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही. ज्याचं योगदान नाहीत ते श्रेय घेत आहेत अशीही टीका महाजन यांच्यावर खडसे यांनी केली आहे.