
धरणगाव | प्रतिनिधी
खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून उधना-पुणे व्हाया नंदुरबार, शिंदखेडा, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, मनमाड या मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याबाबत 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या पश्चिम रेल्वेच्या ZRUCC बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी याबाबत घोषणा केल्याची माहिती ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांनी दिली.
मुंबई येथे झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशातील ZRUCC सदस्य, खासदार, आमदार तसेच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रतीक जैन यांनी खान्देशातील विविध रेल्वे प्रश्न व प्रवाशांच्या मागण्या प्रभावीपणे मांडल्या.
यामध्ये उधना-पुणे नवीन रेल्वे सुरू करणे, सुरत-भुसावळ पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करणे, ताप्ती गंगा व बरौनी एक्सप्रेसला धरणगाव येथे थांबा देणे, सुरत-अमरावती एक्सप्रेस सातही दिवस सुरू करणे, प्रेरणा एक्सप्रेसला अमळनेर येथे थांबा देणे, भुसावळ-नंदुरबार एक्सप्रेस सुरतपर्यंत वाढविणे आदी मागण्यांचा समावेश होता.
तसेच खान्देश एक्सप्रेसला LHB कोच देणे, भुसावळ-दादर गाडी कायमस्वरूपी करणे, हॉलिडे एक्सप्रेसला धरणगाव व अमळनेर येथे थांबा देणे, चेन्नई-भगत की कोठी एक्सप्रेसला धरणगाव व अमळनेर येथे थांबा देणे यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या.
धरणगाव व अमळनेर रेल्वे स्थानकांवरील अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेतील कामे, FOB, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा याबाबतही चर्चा करण्यात आली. धरणगाव स्थानकावर मालधक्का व RPF आउट पोस्ट सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
खान्देशातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली असून त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली. या मागण्यांमुळे धरणगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



