जळगाव : प्रतिनिधी
चोपडा शहरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.०० ते दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारी परिसरात ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) याचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS नं. १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर) व निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक) यांनी पूर्वीच्या वैमनस्यातून हा खून केल्याचे समोर आले. गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी तात्काळ फरार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबईकडे गेल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलीस पथक तातडीने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादर येथून जळगावकडे रेल्वेने निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून रेल्वेत चढून तपास सुरू ठेवला. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतच दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपींना जळगाव येथे आणून चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांनी पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. सोपान गोरे, पोउनि. जितेंद्र वल्टे व त्यांच्या पथकाने केली. तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसेले व पोउनि. चेतन परदेशी यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



