अमळनेर : प्रतिनिधी
शहराजवळील दाजीबा नगर समोरील गलवाडे रस्त्यावर नुकत्याच तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने गायत्री सूर्यवंशी या महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. तर, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मुडी- मांडळ येथील गायत्री प्रशांत सूर्यवंशी (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. गायत्री सूर्यवंशी या २८ मार्चला सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पती डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह दुचाकीने मुडीहून अमळनेरकडे जात होत्या. दाजीबा नगर परिसरासमोरील रस्त्यावर नुकताच तयार करण्यात आलेला गतिरोधक उंच असल्याने त्यावर त्यांची दुचाकी आदळली. यामुळे मागे बसलेल्या गायत्री सूर्यवंशी या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. तर, अपघातानंतर त्यांना तत्काळ अमळनेरातील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मयत गायत्री सूर्यवंशी यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, संबंधित गतिरोधकाच्या उंचीबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून अवघ्या पाच-सहा दिवसातच त्याठिकाणी तीन ते चार अपघात झाले आहेत. अशा निकृष्ट नियोजनामुळे अपघात घडत असल्याची चर्चा सुरू आहे.



