धरणगाव | प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव, यात्रा महोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीला शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजप्रमुख आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांनुसार सण-उत्सव काळात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून कोणतीही उपयुक्त माहिती तातडीने धरणगाव पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी केले.
बैठकीत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पी. एम. पाटील, ॲड. वसंतराव भोलाने, आर. डी. महाजन, पत्रकार रवी महाजन आणि विनोद रोकडे यांनी शहरातील विविध समस्यांवर आपली मते मांडली.
यावेळी पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आगामी गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
तसेच गणेशोत्सव, यात्रा महोत्सव आणि नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे, तसेच विविध मंडळांनी जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे देखावे व उपक्रम राबवावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी केले. पोलिस प्रशासनाने नागरिकांना कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.



