मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राजकारणात “राजकीय भूकंप” आणि “ऑपरेशन टायगर/तुतारी” या विधानांमुळे निर्माण झालेल्या खळबळीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे.
नुकत्याच नांदेड दौऱ्यावर असताना ज्योती वाघमारे यांनी “राज्यात योग्य वेळी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार” असे सूचक विधान केले होते. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शिंदे यांनी उपरोधिक शब्दांत म्हटले की, “ज्योती वाघमारे यांना प्रथमच राज्यसभेवर संधी मिळाली आहे. त्या जनतेच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा आहे. मात्र, दिल्लीत गेल्यानंतर त्या ‘ऑपरेशन’ कधीपासून करायला लागल्या हेच समजत नाही.” शिंदे यांनी वाघमारे यांना सध्याच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. “इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या अडचणींवर त्यांनी भूमिका मांडावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील स्थानिक समस्यांवर बोलताना शिंदे यांनी गॅस टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर ऑटोचालकांनी अश्रूंनी आपली व्यथा मांडली, तर मंगलप्रभात लोढा यांनीही गॅस टंचाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गॅस टंचाई नसल्याचे सांगत असताना, दुसरीकडे हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याचे वास्तव आहे, असे त्यांनी नमूद केले.
राजकीय फोडाफोडीच्या चर्चांवरही शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली. “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे खासदार दिल्लीत ठाम भूमिका मांडत आहेत. आमचा एकही खासदार फुटणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना देखील फोडाफोडीचे राजकारण का केले जात आहे, हे समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक मजबूत पर्याय आहे आणि तो जनतेसमोर स्पष्टपणे उभा राहत आहे.”



