जळगाव : प्रतिनिधी
प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास खांबाला बांधून नग्न करत, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या तरुणाला दुचाकीने त्यांच्या गावातील घरापर्यंत आणत मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्यात.



