मुक्ताईनगर : वृत्तसंस्था
मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (४) आणि अंकिता संजय नाफडे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडून सातोडच्या दिशेने ही कार जात होती. सकाळी साडेआठच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने कार वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन झाडांवर आदळली. जोरदार धडकेमुळे कार उलटली आणि या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चालकाचे काका, काकू आणि पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चिंचवे आणि उमराणे येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
नाफडे कुटुंबाचे मूळ गाव सातोड असले तरी ते गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास होते. होळी उत्सवानिमित्त देवदर्शनासाठी संपूर्ण कुटुंब गावी येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच सातोड येथील ग्रामस्थांनीही तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सातोड गावाकडे आणण्याची तयारी सुरू असून जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



