भुसावळ : प्रतिनिधी
लग्नसमारंभात वऱ्हाडी असल्याचे भासवून शिरलेल्या चोरट्यांनी नववधूच्या दागिन्यांची पर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ येथे तब्बल दहा दिवस ठाण मांडत दोन संशयित आरोपींना अटक केली. रितीक सिकंदर सिसोदीया आणि कृषी निरज बेडीया (दोघे रा. कडिया सांसी, तहसील नरसिंहपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुसावळ येथील बालाजी लॉन्स येथे ६ फेब्रुवारी रोजी उज्ज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडत होता. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास नववधूचे दागिने असलेली पर्स सोफ्यावर ठेवण्यात आली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ही पर्स लंपास केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज तसेच लग्नसमारंभात चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडिओंचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील कडिया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. राजगढ येथे पोलिसांनी तब्बल दहा दिवस तळ ठोकून रितीक सिकंदर सिसोदीया आणि कृषी निरज बेडीया या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने कृषी बेडीया याने गावाला जात असल्याचे सांगत आपल्या मावशीच्या पती निरोत्तम सिसोदीया याच्याकडे ठेवले असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तसेच चांदीच्या लवंगा असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे लग्नसमारंभातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



