व्हिडीओ व्हायरल करत जय, रोहित आणि युगेंद्र पवार आक्रमक; कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता नव्या घडामोडींना वेग आला आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. बारामती विमानतळावर उतरताना विमान आधी एका झाडावर आदळले आणि त्यानंतर खाली कोसळले, अशी प्राथमिक माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या अहवालातून समोर आली होती. या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली असतानाच आता पवार कुटुंबीयांनी सामाजिक माध्यमांवरून थेट भूमिका मांडत प्रकरण अधिक तापवले आहे.
या प्रकरणात सर्वप्रथम अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनीही अधिकृत सामाजिक माध्यम खात्यांवर तोच व्हिडीओ प्रसिद्ध करत कठोर कारवाईची मागणी केली. या पोस्टमुळे पवार कुटुंब या कठीण प्रसंगी एकत्र उभे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.युगेंद्र पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे मुख्य पायलटच्या आसनावर बसलेले दिसतात. विशेष म्हणजे विमान आकाशात असताना ते झोपलेले असल्याचे दृश्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला. “केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी, कंपनीची सर्व उड्डाणे त्वरित थांबवावीत तसेच मालक आणि संचालकांवर गुन्हे दाखल करावेत,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
जय पवार यांनीही भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडत, “माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर राहील,” असे म्हटले आहे. उड्डाण सुरू असताना मुख्य पायलट झोपलेला दिसणे हे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडे तातडीने कारवाईची मागणी करत, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीची सर्व विमाने जमिनीवर ठेवावीत आणि संबंधितांवर कडक कायदेशीर पावले उचलावीत, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. “ही एका मुलाची आर्त हाक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. राज्यातील आणि केंद्रातील काही मोठ्या नेत्यांशी जवळीक असल्यामुळे संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. व्हिडीओ समोर आल्यानंतरही कारवाईबाबत साशंकता असल्याचे सांगत त्यांनी DGCAच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच पवार कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे इतक्या ठाम शब्दांत भूमिका घेतली आहे. अपघातामागील कारणे स्पष्ट व्हावीत आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, ही त्यांची एकमुखी मागणी आहे. “अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना आम्ही कदापि सोडणार नाही,” असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे विमान अपघात प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून आता केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा पुढे काय पावले उचलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



