छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नल परिसरात रविवारी (२२ फेब्रुवारी) सायंकाळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मद्यधुंद दुचाकीस्वार आणि त्याच्या पत्नीने भररस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे, मदतीसाठी वारंवार संदेश पाठवूनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागला. या प्रकरणी सोमनाथ मुरलीधर गिरी (वय २७, रा. चांदननगर, ता. नेवासा) आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सिडको वाहतूक शाखेचे अंमलदार रावसाहेब पचलोरे (वय ४७) आणि संतोष खरात हे दुपारी साडेचारच्या सुमारास हायकोर्टासमोरील सिग्नलवर वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी संशयावरून थांबवलेल्या दुचाकीस्वार सोमनाथ गिरी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला थांबवून विचारणा केली असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद चिघळल्यानंतर त्याने आपल्या पत्नीस घटनास्थळी बोलावले. दोघांनी मिळून पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पचलोरे यांच्या गालावर थप्पड मारली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रस्त्यात आडवे झोपून वाहतूक अडवली. त्यामुळे काही काळ जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली.
घटनेनंतर पचलोरे यांनी तातडीने संदेश यंत्रणा आणि दूरध्वनीद्वारे नियंत्रण कक्ष तसेच पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली. मात्र, हायकोर्ट सिग्नलसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिस मदत पोहोचण्यासाठी तब्बल ६० मिनिटे लागल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, रिक्षाचालक महादेव जाटवे आणि मनजितसिंग चंडोक यांनी पुढे येत पोलिसांना मदत केली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पुंडलिकनगर पोलिस व दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित दांपत्याला ताब्यात घेतले. सोमनाथ गिरी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि मद्यप्राशन करून गोंधळ घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
घटनेदरम्यान शेकडो नागरिक उपस्थित होते. अनेकांनी या प्रकाराचे चित्रण करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. ते चित्रफिती वेगाने प्रसारित झाल्यानंतर नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. हायकोर्ट सिग्नलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हात उचलला जात असताना मदत पोहोचण्यास झालेला विलंब गंभीर मानला जात आहे. पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्या आणि दामिनी पथक त्या वेळी नेमके कुठे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



