सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून भाजपा–शिवसेना युती सरकारने विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार, उपाध्यक्ष कैलास पाटील, सुरेश पवार तसेच बांभोरीचे सरपंच सचिन भाऊ बिराडे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व सरपंचांच्या वतीने आभार मानले. त्यांनी सांगितले की, ग्रामविकासाची कामे अर्धवट राहू नयेत आणि प्रशासनात सातत्य राहावे यासाठी परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
याबाबत सर्व पदाधिकारी व सरपंचांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच शासनाने हा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
दरम्यान, मुदतवाढ मिळाल्यामुळे ग्रामपंचायतींमधील विकासकामे, प्रलंबित योजना आणि निधीवाटप प्रक्रियेला वेग मिळेल, असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला आहे.



