जळगाव : प्रतिनिधी
पत्नी नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी व मुले बाहेर गेलेले असताना सुकलाल नारायण गोपाळ (४५, रा. समतानगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी समतानगरात घडली. मुलीचे १५ ते २० दिवसांवर लग्न आले असताना प्रौढाने जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे सुकलाल गोपाळ यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. त्यांच्या मुलीचे लग्न ठरले असून त्याची घरात लगबग सुरू असताना ९ रोजी त्यांची पत्नी जवखेडा या मूळगावी नातेवाईकांकडे लग्नाला गेली होती. तर मुलगा व मुलगी बाहेर गेलेले होते. त्यावेळी गोपाळ यांनी घरात गळफास घेतला. मुलगा घरी आला त्यावेळी ही घटना लक्षात आली. प्रौढास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहेत



