बारामती : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारी घटना आज बारामती येथे घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत विमानात असलेले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एच.सी. विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की पाचही जणांचा जागीच अंत झाला.
अपघाताच्या काही क्षण आधीची थरारक कहाणी आता समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार, विमान कोसळण्यापूर्वी सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – “ओह शिट… ओह शिट”. त्या वेळी विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्या हातात होती.
सकाळच्या वेळेस दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र रनवे स्पष्ट दिसत नसल्याने विमान पुन्हा वर घेण्यात आले. काही वेळाने दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने येत होते, मात्र धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच ते अचानक उलटले आणि जोरात जमिनीवर आदळले.
बारामती विमानतळालगत गावाचा परिसर असल्याने अनेक नागरिकांनी हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहिला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान धावपट्टीपासून सुमारे 100 फूट आधीच कोसळले. “विमान खाली येत असताना काहीतरी बिघडले आहे, असे वाटत होते आणि क्षणातच अपघात झाला,” असे त्याने सांगितले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, जमिनीवर आदळताच विमानात मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. त्यानंतर सलग 4 ते 5 स्फोट झाले. स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले, मात्र आगीचा वेग आणि तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही विमानाजवळ जाता आले नाही. एका गावकऱ्याने सांगितले की, “विमान आधी आमच्या गावावरून गेले. नंतर खाली येताना दिसले. धावपट्टीकडे जाताना ते उलटले आणि जोरात जमिनीवर आदळले. स्फोटानंतर विमानाचे तुकडे उडून थेट आमच्या घरापर्यंत येऊन पडले.” या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, एक अनुभवी नेता, कर्तव्यनिष्ठ सुरक्षारक्षक आणि कुशल वैमानिकांसह पाच जणांचे प्राण एका क्षणात गेले. राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत.



