मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचेही वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे ज्या १४ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा स्थिर आहे, त्या ठिकाणच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून, येत्या २१ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत, म्हणजेच २३ ते ३० डिसेंबरदरम्यान, आरक्षणाची मर्यादा स्थिर असलेल्या १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगावर वेळेत निवडणुका घेण्याचा दबाव असून, त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी वेगाने सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली असून, ग्रामीण राजकारणात येत्या काही दिवसांत मोठ्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.



