नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील हरियाणातील पानिपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानिपत पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करताना चार मुलांचे खून उघडकीस आणले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी ही पीडितांपैकी एका मुलाची आई आहे. पोलिसांनी 34 वर्षीय पूनमला अटक केली असून तिने चौकशीत थरकाप उडवणारी कबुली दिली आहे, तिला आपल्या मुलांपेक्षा ‘जास्त आकर्षक’ दिसणाऱ्या मुलांना ठार मारण्याची इच्छा व्हायची.
पोलिसांच्या मते, पूनमने केवळ अन्य मुलांनाच नाही तर स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलालाही मारले. कारण, तिला भीती वाटत होती की तो तिच्या आधीच्या खुनाबद्दल माहिती सांगेल. एक मुलगा आणि तीन मुलींची पूनमने हत्या केली आहे. ही मुलं नातेवाईकांच्या घरातील आहेत. ज्यांच्या मृत्यूला कुटुंबीयांनी आतापर्यंत अपघात मानलं होतं. पण चौथ्या प्रकरणाने पोलिसांना संशय आला आणि अखेर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
1 डिसेंबर रोजी नौल्था गावात एका लग्नसमारंभादरम्यान सहा वर्षांची विधी नावाची मुवगी गायब झाली. शोधाशोध सुरू असताना पहाटे तिची आजी जेव्हा पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गेली, तेव्हा दरवाजा बाहेरून बंद होता. आत गेल्यावर विधी प्लास्टिकच्या टबमध्ये उलटी पडलेली दिसली. तिचं फक्त डोकं पाण्यात होतं. तिला तातडीने इसराणा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोस्टमार्टेममध्ये मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू केली. विधीची मावशी पूनमशी बोलताना तिच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळली आणि पोलिसांना तिच्यावर संशय आला. चौकशीत पूनमने केवळ विधी नव्हे तर इतर तीन मुलांचेही खून केल्याची कबुली दिली. चारही मुलांना तिने पाण्याच्या टबमध्ये बुडवून एकाच पद्धतीने मारले आहे.
पूनमचा विवाह 2019 मध्ये झाला. पहिला खून जानेवारी 2023 मध्ये झाला, जेव्हा तिने आपल्या नंदेची नऊ वर्षांची मुलगी, ईशिकाला, घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून मारले. त्यानंतर काही महिन्यांनी तिने स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलाला शुभमला ठार केलं. कारण तो पहिल्या खुनाचा साक्षीदार होता, असं तिने सांगितलं. दोन्ही मृत्यूंना त्या वेळी कुटुंबीयांनी अपघात समजलं.
या वर्षी ऑगस्टमध्ये तिने आपल्या चुलत बहिणीची सहा वर्षांची मुलगी जिया हिचाही अशाच पद्धतीने बळी घेतला. हा मृत्यूही अपघात म्हणूनच नोंदवला गेला. आणि आता शेवटी नौल्थात विधीचा मृतदेह सापडल्यावर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांच्या मते, पूनमला सतत अशी भीती वाटायची की तिच्या मुलांपेक्षा सुंदर दिसणारी मुलं ‘धोकादायक’ आहेत. त्यांच्याविषयी ती मनात राग आणि हेवा बाळगत होती. ही मानसिक अवस्थाच चार निरपराध जीवांच्या मृत्यूचं कारण ठरली, या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करत आहेत.
पूनमचा पती शेतकरी असून त्यांना अजून एक चार वर्षांचा मुलगा आहे. आरोपीला मंगळवारी अटक झाली असून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत अपघात समजल्या गेलेल्या तीन मृत्यूंचा आता पोलिस तपास करणार आहेत. घरातील सदस्यानेच चार चिमुकल्यांचा जीव घेतला, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.


