जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील नवनाथ नगर येथील घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३ ) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठल नगरात सुभाष पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होते. सर्वजण नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामावर निघून गेले होते. त्यामुळे सुभाष पाटील हे घरी एकटेच होते. दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसतांना त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
सायंकाळी त्यांचा मुलगा घरी आला असता, त्याला वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. वडिलांचा मृतदेह बघताच त्याने एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ जितेंद्र राठोड हे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत सुभाष पाटील यांना मयत घोषीत केले.


