छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरातील पुंडलिकनगर परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. महारुद्र हनुमान मंदिराजवळील एका दुमजली इमारतीत झालेल्या या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे इमारतीत अडकलेल्या अन्य नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर परिसरातील संबंधित दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर दुकाने असून वरच्या मजल्यावर निवासी घरे आहेत. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील एका दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानाच्या पाठीमागील खोलीत ठेवलेल्या चार गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचा गळतीमुळे भीषण स्फोट झाला.
स्फोट इतका जोरदार होता की त्याचे हादरे परिसरातील अनेक घरांपर्यंत जाणवले. या दुर्घटनेत पाठीमागील खोलीत राहणाऱ्या सुनंदा राजेंद्र मोरे (वय ४५) या महिलेचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. स्फोटानंतर संपूर्ण घराला आगीने वेढले आणि घरातील साहित्य काही मिनिटांत जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र त्यापूर्वी परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता इमारतीत अडकलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दुर्घटनेनंतर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर भाजपचे स्थानिक नगरसेवक अशोक दामले यांनी महावितरणच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. दामले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आग लागल्यानंतर महावितरणला वारंवार संपर्क करून वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
“आमच्या डोळ्यासमोर ती महिला खिडकीतून ‘वाचवा… वाचवा…’ अशी आर्त हाक मारत होती. मात्र परिसरातील लटकत्या विद्युत तारांमुळे आणि वीजपुरवठा बंद न झाल्याने आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही,” असा आरोप दामले यांनी केला. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेला असल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पीडित कुटुंबाला मोठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या दुर्घटनेमुळे पुंडलिकनगर परिसरात शोककळा पसरली असून, गॅस सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणांच्या प्रतिसादाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



