पुणे : वृत्तसंस्था
देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना दिवाळीच्या मंगलमय सणात पुण्यातील वातावरण एकीकडे पाडवा पहाटेच्या पारंपरिक जल्लोषाने उजळले, तर दुसरीकडे शहरातील विविध भागांत लागलेल्या सलग 40 हून अधिक आगींनी प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरत करायला लावली. दरम्यान, सारसबाग येथील सुप्रसिद्ध दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. हिंदुत्त्ववादी संघटनांकडून मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आधीच वादात सापडला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असला तरी दिवाळीच्या दिवसाची सुरुवातच गोंधळात झाली.
सारसबागेत पहाटे तीन वाजल्यापासूनच पुणेकर तरुणाईचा मोठा जमाव पाडवा पहाट कार्यक्रमासाठी जमा झाला होता. पारंपरिक वेषात, हातात झेंडे व दिमाखदार साजशृंगारासह युवकांनी सांस्कृतिक सादरीकरणाचा आनंद घेतला. तथापि, पहाटे साडेपाचच्या सुमारास किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर धाव घेताच परिसरात तणाव निर्माण झाला. तैनात पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
गेल्या 28 वर्षांपासून चालत असलेल्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला यंदा हिंदुत्त्ववादी संघटनांकडून विरोध झाला होता. या संघटनांनी कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे आयोजकांनी काही दिवसांपूर्वी कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सारसबाग आणि परिसरात पहाटेपासूनच कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सलग 40हून अधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळी 5.12 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत अग्निशमन विभागाला सतत कॉल येत राहिले. हडपसर, वारजे, कोथरूड, कसबा पेठ, धानोरी, सिंहगड रोड, बाणेर, औंध, येरवडा, विश्रांतवाडी, मार्केट यार्ड, कोंढवा खुर्द अशा सर्व भागांमध्ये एकापाठोपाठ एक आग लागल्याच्या घटना समोर आल्या. काही ठिकाणी इमारतींच्या गॅलऱ्यांमध्ये, पार्किंगमध्ये, झाडांना, गवताला किंवा कचऱ्याला आग लागल्याच्या नोंदी आहेत, तर काही ठिकाणी दुकानं आणि घरांनाही आग लागल्याचं दिसून आलं. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 42 ठिकाणी आग लागल्याचे कॉल प्राप्त झाले होते. बहुतेक ठिकाणी आगीचे कारण आकाशकंदील, फटाके किंवा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र काही ठिकाणी किरकोळ जखमी झाल्याच्या घटना आहेत.
अग्निशमन दलाच्या सर्व वाहनांची अक्षरशः धावपळ सुरू होती. सकाळी 5 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या सुमारे 25 गाड्यांनी 40 हून अधिक ठिकाणी आगी विझवल्या. मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, नवले, वारजे, बाणेर, येरवडा, कोथरूड, धानोरी आणि गंगाधाम केंद्रातील अधिकारी आणि जवान दिवसभर रस्त्यावर होते. काही ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दीड-दोन तास लागले. दिवाळीच्या दिवशीसुद्धा अग्निशमन कर्मचारी घरच्यांपासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आजचा दिवस आम्हाला सर्वात धकाधकीचा गेला. अनेक कॉल एकाचवेळी आले, पण आमच्या पथकांनी तातडीने प्रतिसाद देऊन मोठे अनर्थ टाळले. नागरिकांनी आकाशकंदील, इलेक्ट्रिक माळा आणि फटाके वापरताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.


