मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला, असे मनोज जरांगे म्हणालेत. तसेच या प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे रविवारी लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकत सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषि मंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. छावाचे कार्यकर्ते बाहेर येताच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घाडगे पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणावरून अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या सर्व घडामोडींवर मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे.
हा हल्ला तटकरे साहेबांनीच घडवून आणला आहे, अशी आमची शंका आहे. हा घडवून आणलेला, पूर्वनियोजित प्रकार आहे. यामध्ये मराठा समाजाविषयी असलेला द्वेष स्पष्टपणे दिसतो. विजय भैय्या हे शेतकऱ्यांचे लेकरू आहे. ते जर आज मागणी करायला गेलेत तर तुम्ही त्यांना मारता. म्हणजे हे तुम्हाला सोपे जाणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. अजित दादांनी कठोरात कठोर कारवाई करून केवळ पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हाकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी ही मनोज जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “हे लोक अजितदादांवरही काळे फासण्याचे काम करत आहेत. अजित पवारांचा राज्यात जनाधार वाढतो आहे, तरुण त्यांच्यामागे उभे राहत आहेत. पण काही नाकर्ते, अतिरेकी कार्यकर्ते जर पक्षाच्या पदांवर राहिले, तर त्याचा फटका थेट अजितदादांना बसतो. असे लोक पदावर ठेवण्याच्या कामाचे नसतात.
मनोज जरांगे पाटील यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही इशारा दिला. ते म्हणाले, “कुठल्याही मंत्र्याने आपल्या पदाची गणीमा राखली पाहिजे. आपण कुठल्या पदावर आहोत राज्याच्या जनतेचा आपण प्रतिनिधित्व करत आहोत. मात्र इथून पुढे देखील कोकाटे साहेबांनी आपल्या स्वभावात बदल करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर शेतकरी वर्ग त्यांच्या अंगावर जाईल. त्यामुळे त्यांनी मंत्री पदाची, विधान भवनाची आणि राज्यातील मायबाप जनतेची गणिमा आखली पाहिजे. नाहीतर पुढच्या काळात देखील त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागेल.”



