मुंबई : वृत्तसंस्था
मराठी अस्मितेच्या मुद्यावरून मीरा-भाईंदरमध्ये आज मनसे आणि शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोर्चाची हाक देण्यात आली होती. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये आज मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
तसेच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले होते. तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होते. यावेळी मनसैनिकांची पोलीसांकडूंन धरपकड सुरू करण्यात आली.
परंतु, मराठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर पोलिसांनी बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. त्यामुळे मीरा भाईंदरमधील हा मराठी मोर्चा काहीप्रमाणात यशस्वी ठरला आहे. यानंतर आता अविनाश जाधव यांच्यासह पदधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी सोडले आहे. त्यानंतर अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाने दाखवलेल्या एकीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “मला ताब्यात घेण्यापेक्षा आजचा मोर्चा होणे महत्त्वाचे होते. आम्ही नसतानाही लोकं तिकडे रस्त्यावर उतरली होती. त्यांनी मराठीचा माज काय असतो, हे दाखवून दिले. ज्या लोकांनी या सगळ्या गोष्ट केल्या आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु, मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की, आज मराठी माणूस एकजूट झाला.”
पुढे ते म्हणाले, “मला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मीरा भाईंदर, वसई आणि विरारमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली नसती आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाला असते तर हा मोर्चा प्रचंड झाला असता. हा मोर्चा होणे खूप गरजेचे होते. महाराष्ट्राच्याविरोधात 100 -200 लोक मोर्चा काढत असतील तर त्याला पाच-पंचवीस हजारांच्याच गर्दीनेच उत्तर देणे गरजेचे होते. यापुढे कोणीही अशाप्रकारे महाराष्ट्र आणि मराठीविरोधात मोर्चा काढायची हिंमत करणार नाही,” असे अविनाश जाधव यांनी म्हटले.


