नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ हे समीकरण चांगलं खेळलं आहे. नागपूर महापालिकेत अनेक समस्या प्रलंबित असताना भाजपने केवळ पैशाच्या बळावर सत्तेवर ताबा मिळवण्यावर भर दिला आहे. शहराच्या विकासाऐवजी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारला आहे. आम्ही हे सर्व प्रश्न जनतेसमोर मांडणार आहोत.
महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागपूरच्या विकासाऐवजी फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचेच असूनही शहराच्या विकासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवर आणि राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखड मत मांडले. विशेषतः नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. वडेट्टीवारांनी ओबीसी जनगणनेवरूनही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी समाजाच्या पाठीवर स्वार होऊन भाजप सत्तेत आली, पण आज त्यांच्यावर अन्याय होत आहे. राहुल गांधी यांनी जनगणनेची मूळ मागणी केली आणि सरकारने घाबरून घोषणा केली, पण ती केवळ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.


