
जळगाव : प्रतिनिधी
बांभोरी पुलावरून नदी पात्रात उडी घेतलेल्या जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५, रा. भिकमचंद नगर) या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सापडला. गेल्या सतरा तासांपासून या महिलेचा शोध सुरु सुरु होता. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने शोध मोहीम राबवित मृतदेह शोधून काढला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील भिकमचंद नगरमधील जयश्री चौधरी या महिलेने शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलावरून नदी पात्रात उडी घेतली होती. ही घटना पोलिसांना समजताच शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र अंधार असल्यामुळे महिलेचा शोध लागला नव्हता. शनिवारी सकाळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावले असता मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी साडेनऊ वाजता शोधकार्य सुरू केले. शोध मोहिमेमध्ये अग्नीशमन दलाचे देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभचिकटे, सत्तार तडवी, चिराग वाघ यांच्यासह वन्यजीव संरक्षण संस्थेचे गणेश सपकाळे, रवी भोई, नीलेश कोळी, दिनेश सपकाळे, योगेश गालफाडे आणि हेमराज सपकाळे यांनी सहभागी होत जिवाची बाजी लावून खोल पाण्यात शोध घेतला.
कर्मचाऱ्यांनी पुलाच्या पिलरजवळील भागात खोल पाण्यात उतरुन शोध घेतला. त्यावेळी जवान रवींद्र बोरसे यांना पुलाच्या पिलरजवळ ही महिला सापडली. पथकाने तिला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करत आहेत.



