
जळगाव : प्रतिनिधी
स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नसून गावागावांतील नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान लोकचळवळ म्हणून राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.
‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही यावर्षीच्या अभियानाची संकल्पना आहे. अभियानाच्या कालावधीत गावांमधील अस्वच्छ व अडचणीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता ज्ञानयात्रा, सफाईमित्र व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व सन्मान शिबिरे, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरणाबाबत घरोघरी जनजागृती तसेच ‘वेस्ट टू वेल्थ’ आणि ‘वेस्ट टू आर्ट’ यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून अभियानाचे नेतृत्व करावे. नागरिकांना अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देशही करिश्मा नायर यांनी दिले आहेत. स्वच्छाग्रही व स्वच्छता दूतांनी घराघरांत पोहोचून कचरा वर्गीकरण व स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळांमधून स्वच्छता ज्ञानयात्रा व जनजागृती फेऱ्यांमध्ये पुढाकार घ्यावा. तसेच सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट व युवक मंडळांनी श्रमदान व स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
धर्मगुरू व आध्यात्मिक नेत्यांनी आपल्या प्रवचन, सत्संग व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सेवा आहे. गावातील प्रत्येक हात या कार्यात जोडला गेला, तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न साकार होईल,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले. दरम्यान, सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे दैनंदिन अहवाल व छायाचित्रे विहित पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राहुल जाधव यांनीही जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणांना ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.



