
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात घुसलेल्या प्रत्येक बेकायदा घुसखोराला शोधून देशाबाहेर हाकलणार, असा इशारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत दिला. तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(रालोआ) २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
नरिमन पॉईंट येथील मविम सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा, एनआरसी व बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर केंद्राचा आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. घुसखोरांचा शोध घेण्यासाठी सरकार कोणती रणनीती वापरणार, हे सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. मणिपूर आणि देशभरातील एनआरसीबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
२०२९ पूर्वी समान नागरी कायद्याची घोषणा आणि घुसखोरांवर कारवाईचा इशारा देऊन भाजपने आगामी निवडणुकांसाठी हिंदुत्वाची वैचारिक रणनीती आतापासूनच स्पष्ट केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यातील विधानसभा २०२७ मध्ये होणार आहेत. तेथे हिंदुत्व अजेंड्याने निवडणुकीत यश मिळविण्याची पक्षाची रणनिती आहे.
समान नागरी कायदा (यूसीसी) गोवा व उत्तराखंड या दोन राज्यांत लागू आहे, तर गुजरात, आसाम व मध्य प्रदेश विधानसभेने हे विधेयक मंजूर आहे. महाराष्ट्रात ७ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. जनसेवा हीच प्रभू सेवा हा या अभियानाचा मूळ मंत्र आहे. १० वर्षांत भ्रष्टाचार, घराणेशाही संपून कामगिरीवर आधारित राजकारणाचे युग सुरू झाले. २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले असून दहशतवादाविरोधात सरकारने शून्य सहिष्णुता धोरण अवलंबल्याचे शाह यांनी सांगितले.



