
भुसावळ : भुसावळच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईतील नंदवन येथे प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रवेशावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सरिता माळी कोल्हे आणि जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले.
अनिल चौधरी आणि गायत्रीताई भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात आगामी काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



