
अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात २८ रोजी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांत मातोश्री नगर परिसरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चामुंडा माता मंदिराच्या दरवाजाचे २८ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील कपाट फोडून त्यातील ऐवज चोरी केला. तसेच माते मूर्तीवरील सोन्याच्या टिकल्या, बांगड्या तसेच दानपेटीतील रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी मंदिरातील कपाटे व इतर साहित्याचीही नासधूस केली आहे.
सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेमुळे मातोश्री नगर परिसरात खळबळ उडाली असून, सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



