धरणगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामात पीक पाहणीचे काम करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पीक पाहणी सहाय्यकांनी थकीत मानधन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
मागील तीन वर्षांपासून पीक पाहणीचे काम करूनही मानधन थकीत असल्याने सहाय्यकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी मानधन नियमित मिळावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय नैसर्गिक आपत्ती तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षा कवच मिळावे, सर्व पीक पाहणी सहाय्यकांना शासकीय ओळखपत्र देण्यात यावे, शेतातील पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र मिळण्याबाबत शासन स्तरावरून स्पष्ट आदेश काढण्यात यावेत, पीक पाहणीसाठी 5G मोबाईल उपलब्ध करून द्यावा आणि सर्व सहाय्यकांना विमाकवच लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनावर तालुक्यातील सर्व पीक पाहणी सहाय्यकांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन सादर करताना तालुक्यातील सर्व सहाय्यक उपस्थित होते.



