एरंडोल | प्रतिनिधी : अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंजनी धरणातून कोणत्याही वेळी अंजनी नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडण्यात येऊ शकते, असा इशारा पाटबंधारे उपविभाग, एरंडोल यांनी दिला आहे.
याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३१ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत सरपंच, पोलिस पाटील आणि नदीकाठच्या गावांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
पत्रानुसार, धरणातील आवक लक्षात घेऊन कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यामुळे अंजनी नदीकाठील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवावी आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच संबंधित गावांनी दवंडी देऊन नागरिकांना तातडीने सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



