जळगाव : प्रतिनिधी
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमूना नगरसह कांचन नगरातील बिंदूबाई हॉल येथे दोन अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याची तयारी सुरू होती. शनिपेठ पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत दोघांचे बालविवाह रोखले आणि वधू-वरांच्या आई-वडिलांना समज दिली. अन्य गावातील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमुनानगर व कांचननगरमधील तरुणांशी दोन वेगवेगळ्या दिवशी लावला जात होता.
याबाबतची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक प्रिया दातीर, संतोष खेडकर, पोहेकों विजय खैरे, अजय निकम, अनिल साळुंखे, अमोल वंजारी, पराग दुसाने, नीलेश घुगे, नत्वजीत चौधरी, संभाजी पाटील गणेश ढाकणे यांनी वेळीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालविवाह रोखले. लग्नघरी हळद लावण्याची तयारी झाली आणि पोलिस पथक तेथे पोहचले आणि त्यांनी सुरु असलेला बालविवाह रोखला.
विवाह करण्यासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष असणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास वधू-वरांच्या मातापितांवरच नव्हे तर विवाहाला मूक संमती देणाऱ्या नातेवाईक, पुरोहीत, मंडप, डेकोरेटर्ससह बँडवाले आणि फोटो ग्राफर यांना देखील गुन्ह्यात सहआरोपी करुन त्यांचे व्यावसायीक परवाने रद्द केले जाणार आहे.



