मुंबई : वृत्तसंस्था
राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत महायुतीने मतदानापूर्वीच मोठा राजकीय डाव साधत 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली असून राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना. येथे भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ आणि शिवसेना (ठाकरे गट) समर्थित गणेश लोखंडे यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत होत आहे. या मतदारसंघातील निकालाला राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महायुतीने निवडणुकीपूर्वीच रणनीती आखत सहा जागांवर बिनविरोध विजय मिळवला. त्यामुळे मतदानाच्या आधीच सत्ताधारी आघाडीला मोठा मानसिक फायदा झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने उर्वरित जागांवर जोरदार मोर्चेबांधणी केली असून अनेक मतदारसंघांत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका घेत तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शहर काँग्रेसच्या सर्व 17 नगरसेवकांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील काँग्रेस नगरसेवकांना कोणताही व्हिप जारी करण्यात आलेला नसल्याने ते स्वतंत्रपणे मतदान करू शकणार आहेत.
नागपूर स्थानिक प्राधिकरण विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावत असून प्रशासनाने आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
सोलापूर विधान परिषद मतदारसंघात करमाळा, माढा आणि कुर्डुवाडी परिसरातील सुमारे 80 मतदारांसाठी मतदान सुरू झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एकाही मतदाराने हजेरी लावली नसल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, महायुतीच्या सहा उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी, पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.
आता उर्वरित 11 जागांवरील मतदानानंतर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून महायुतीचा विजयाचा सिलसिला कायम राहणार की महाविकास आघाडी पुनरागमन करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



