मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटात विलीन होण्याची विनंती केली आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली असून पक्ष नेतृत्वाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
पत्र पाठविणाऱ्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांचे खंडन करत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्रितपणे पक्ष फोडण्याच्या कथित प्रयत्नांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक पुन्हा पक्षफोडीचा डाव खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. “मला रात्री ११ वाजता विश्वासू सूत्रांकडून माहिती मिळाली की, काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. त्यापैकी १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्सदेखील देण्यात आला आहे,” असा दावा त्यांनी केला. या माहितीची तातडीने सोशल मीडियावर माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
राऊत यांनी खासदारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत १४ जून रोजी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. “त्या बैठकीत काही खासदारांनी साईबाबा, आई भवानी, स्वतःची आई आणि मुलांची शपथ घेत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन दिले होते. आता जर तेच खासदार पक्षाशी बेईमानी करत असतील, तर जनता त्यांना माफ करणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबतही राऊत यांनी गंभीर आरोप केले. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाचा संदर्भ देत त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात या,” असा दबाव टाकण्यात आल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, या आरोपांबाबत संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
या राजकीय घडामोडींची माहिती मिळताच संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी संसद भवनात जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ठाकरे गटाने यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून कोणत्याही फुटीर गटाला मान्यता देण्यापूर्वी पक्षाची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली होती.
विशेष म्हणजे, जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. त्यानंतर शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. आता पुन्हा खासदार पातळीवर सुरू झालेल्या या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेतात आणि ठाकरे गटातील खासदारांची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



