पाचोरा : प्रतिनिधी
घरगुती आणि मालमत्तेच्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरात सोमवारी रात्री घडली. दीपक प्रकाश कानडे (वय ४४, रा. पाचोरा) यांची धारदार शस्त्राने मानेवर वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संतोष कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपक कानडे यांच्या बहिणीचा विवाह आरोपी संतोष कानडे यांच्या भावासोबत झाला होता. काही वर्षांपूर्वी संतोषचा भाऊ मृत झाल्यानंतर संतोष आणि त्याची भावजई यांच्यात विविध कारणांवरून वाद सुरू झाले. घरगुती आणि मालमत्तेशी संबंधित मतभेद वाढत गेल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
सोमवारी हा वाद थेट पाचोरा पोलिस ठाण्यात पोहोचला. संतोष कानडे यांच्या आई-वडिलांनी दीपक कानडे आणि त्यांच्या बहिणीविरोधात मारहाणीची तक्रार दिली. त्याचवेळी दीपक कानडे व त्यांच्या बहिणीनेही आपल्यालाही मारहाण झाल्याची तक्रार नोंदविली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाल्याने वाद अधिकच चिघळला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास दीपक कानडे हे जामनेर रोड परिसरातून जात असताना संतोष कानडे याने त्यांना अडविले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर वार करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या दीपक कानडे यांना नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर आरोपी संतोष कानडे याने फरार होण्याचा प्रयत्न न करता स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक तपासात दीर्घकाळापासून सुरू असलेले घरगुती आणि मालमत्तेचे वाद या खुनामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असून संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून कौटुंबिक वादाने घेतलेल्या हिंसक वळणाबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मृताच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



