विजय पाटील जळगाव : अनेक वर्षांपासून पाळधी ते जळगाव हा रस्ता दर्जेदार आणि सुरक्षित व्हावा, अशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची अपेक्षा होती. शासनाने तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे, तडे आणि पावसाचे तळे निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या मते, अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या लालसेमुळे आणि ठेकेदाराच्या मस्तवालपणामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनला आहे. निविदा मंजूर करताना देखभाल आणि दुरुस्तीची अट असतानाही संबंधित ठेकेदाराला कोणतीही नोटीस दिली जात नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांनी हात काळे केल्यामुळेच ठेकेदार प्रशासनाला ‘कोलदांडा’ देत असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
या महामार्गावरून अनेक व्हीआयपी, राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकारी प्रवास करतात. पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून हा रस्ता मंजूर झाला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि आर्थिक व्यवहारांमुळे रस्त्याचा दर्जा खालावल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, हा रस्ता तयार करणारा ठेकेदार हा प्रकार दिसत नाही का? शासनाच्या निधीची उघड लूट झाल्याचे चित्र या कामातून दिसून येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. अधिकारी आणि ठेकेदार यांचे संगनमत कसे असते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
जैन इरिगेशनसमोर तसेच विद्यापीठ परिसरात रस्त्यावर मोठमोठे पाण्याचे तळे साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या कामाला वर्ष पूर्ण होण्याआधीच ही अवस्था निर्माण झाली असून समांतर रस्त्याचे काम अद्याप सुरूच आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



