मुंबई | प्रतिनिधी
शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, असे संजय राऊत म्हणतात; कदाचित ते काही अंशी खरेही असू शकते. कारण सध्याची राजकीय परिस्थिती जात, धर्म आणि पैशांकडे झुकली आहे,” असे म्हणत त्यांनी राजकारणातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, “मी शिवसेनेत प्रवेश हा मजबुरीमुळे केलेला नाही, तर बदललेल्या परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय आहे. गेली 25 वर्षे मी जनतेलाच माझा नेता मानत आलो. मात्र, निवडणुकीत आमच्या ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे वळण घेतले. काही भाजपमध्ये गेले, काही राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे संघटना टिकवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला.”
कडू यांनी सांगितले की, “विधानसभेसाठी 32 उमेदवार उभे केले, मात्र एकही निवडून आला नाही. आम्ही काय चूक केली? सामाजिक कार्य करणाऱ्यांना लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “गुवाहटीला गेलेले सर्वजण निवडून आले, पण मी एकटाच मागे पडलो,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही ‘प्रहार’ संघटना कायम राहणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. “धनुष्यबाणातून प्रहार करणार आहे. झेंडे बदलले तरी अजेंडा बदलणार नाही. शेतकरी आणि दिव्यांग बांधव हे आमच्यासाठी नेहमीच प्रथम प्राधान्य राहील,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला असून, “तुम्ही जे काम कराल त्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे,” असे आश्वासन दिले आहे.
राजकीय लढाईबाबत बोलताना कडू म्हणाले, “काही गोष्टी सरळ लढून नाही, तर गनिमी काव्याने सिद्ध कराव्या लागतात. हीच छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनिती होती. टीकेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “टीका करणाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत. घरी बसून टीका करणे सोपे असते. पदासाठीच काम करायचे असते तर आम्ही आधीच युती करून निवडणूक लढवली असती. आमचे कार्यकर्ते पदासाठी नाही, तर जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी काम करतात.”



