मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या संवेदनशीलतेवरून राज्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशकाला फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
माहितीनुसार, दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी सुमारे ३७ वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आणि पानसरे कोण होते, असा सवाल उपस्थित केला.
फोनवरील ऑडिओमध्ये गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. त्यांनी प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप आहेत. “घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ कापेन,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. या धमक्यांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून कायदेशीर कारवाईची मागणीही होत आहे.
दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नसून ते गोविंद पानसरे यांचे आहे. हे पुस्तक १९८८ साली प्रकाशित झाले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गायकवाड यांनी आधी पुस्तक वाचावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता; मात्र तो दुर्लक्षित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, धमक्यांना न घाबरता प्रकाशकाने ठाम भूमिका घेतली. “तुम्ही या आणि माझी जीभ कापा,” असे प्रत्युत्तर देत त्यांनी दबावाला झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय मर्यादेत न राहता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही केंद्रित होताना दिसत आहे.
दरम्यान, वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या व्हिडिओतही त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला असून माफी मागितलेली नाही. या घटनेमुळे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयीची संवेदनशीलता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय प्रतिक्रिया यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या प्रकरणात पुढे कायदेशीर किंवा राजकीय पातळीवर कोणती कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



