मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी लढणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवत एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मजल मारली आहे. १३ एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest च्या बेस कॅम्पवर पोहोचत ५,३६४ मीटर (१७,५९४ फूट) उंची गाठली आणि आपल्या जिद्द व चिकाटीचा ठसा उमटवला.
हा ट्रेक अत्यंत खडतर मानला जातो. सलग आठ दिवस दररोज १२ ते १४ किलोमीटर पायी चालत, उंच डोंगर-दऱ्यांतून प्रवास करत ही मोहीम पूर्ण करावी लागते. उंची वाढत गेल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. बेस कॅम्पवर केवळ सुमारे ४५ टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो, त्यामुळे श्वसन करणेही आव्हानात्मक ठरते. याशिवाय उणे १५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारी थंडी ही मोठी कसोटी होती.
या कठीण परिस्थितीत बच्चू कडू यांनी आपल्या मुलासोबत हा ट्रेक पूर्ण केला. ‘द अल्पायनिस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून आयोजित या मोहिमेत त्यांना भगवान चवले यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण १४ सहकाऱ्यांसह त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. शेवटच्या दिवशी तब्बल १७ किलोमीटरचा टप्पा पार करत त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला.
या मोहिमेला त्यांनी सामाजिक आणि प्रेरणादायी संदेशाची जोड दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम भारताचे संविधान आणि भगवद्गीता यांना समर्पित करण्यात आली. देशभक्ती आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्या या उपक्रमातून दिसून आला.
दरम्यान, नेपाळमधील ट्रेकिंग सुविधांचा अनुभव घेतल्यानंतर बच्चू कडूंनी महाराष्ट्रातही अशा सुविधा विकसित करण्याची गरज व्यक्त केली. साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू हे दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी सातत्याने लढा देत आले आहेत. त्यांच्या संघर्षमय वाटचालीत आता एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याची उल्लेखनीय कामगिरी जोडली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारे ते पहिलेच नेते ठरल्याची चर्चा रंगली आहे.



