जळगाव : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या अभिवादन कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार श्री. सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. योगेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुर्बान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयोजित विचार प्रेरणा व्याख्यानात धरणगाव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. बी. एन. चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रामीण समाज व शेतकऱ्यांसाठी योगदान” या विषयावर सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सुधारणा कार्याचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरणा दिली.
समाजकल्याण विभागामार्फत विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक वितरणही या वेळी करण्यात आले. यामध्ये उसतोड कामगारांच्या वारसांना अर्थसहाय्य, परराज्य शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेतील लाभांचे प्रमाणपत्र, कन्यादान योजना व वसतीगृह प्रवेश प्रमाणपत्रांचा समावेश होता. तसेच काही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रे आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाचा उद्देश डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा प्रसार करणे, सामाजिक समतेला चालना देणे व वंचित घटकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणे हा होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने समन्वय साधत चोख नियोजन केले.