अमळनेर : प्रतिनिधी
रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या नायडू गँगमधील चार जणांना अमळनेरच्या रेल्वे पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री अमळनेर रेल्वेस्थानकावर घडली. या चारही जणांना मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अविनाश महानन्ना नायडू (२५), अजय महानन्ना नायडू (२५) आणि काली कुन्नईया नायडू (२९, तिघे रा. वाकीपाडा मरीमाता मंदिराजवळ, नवापूर) आणि राजा आरमबम (३३, रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत खंडवा पोलिसांकडून अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना या गँगमधील लोकांनी खंडवा रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडील सामान चोरी केल्याची आणि यातील काही जण ४ रोजी भुसावळ – उधना गाडीने प्रवास करीत असल्याची माहिती दिली.
त्यावरुन रेल्वे पोलिसांनी रेल्वेगाडी अमळनेर स्टेशनवर येताच संशयितांचा शोध सुरू केला. तीन-चार डबे तपासल्यावर सामान्य कोचमध्ये चार संशयित आढळून आले. त्यांना पोलिसांनी तिकीट आहे का, असा प्रश्न करून अमळनेर स्टेशनवर चौकशीला उतरवले. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच संशयितांनी आपण नायडू गँगचे सदस्य असल्याची कबुली दिली. या नायडू गँगमध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वेमध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याजवळून दोन लॅपटॉप, सहा मोबाईल, चार्जर, घड्याळ, ४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचे साहित्य तसेच दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत. नायडू गँगचे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.