मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील 24 तासात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या राज्यात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मात्र आता राज्यात पावसाची शक्यता असल्याने उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 25 आणि 26 फेब्रुवारीच्या जवळपास बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे महाराष्ट्रात आर्द्रता घेऊन येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसणार आहे. विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान विदर्भात पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात 27 फेब्रुवारी रोजी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवा सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या खाली असून, धुळे येथील कृषी विद्यालयात राज्यातील नीचांकी 9.4 अंशांची नोंद झाली आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात 180 नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत आहे. महाराष्ट्रातही जोरदार वारे वाहत आहेत. आग्नेय मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.