मुंबई : वृत्तसंस्था
अनेक परिवारात छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत असतात, पण ते वाद काही वेळाने मिटत असतात, पण एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विवाहितेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जवळपास ९० टक्के भाजली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडूपच्या सोनापूरमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून महिलेला आज (२७ डिसेंबर) सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं आहे. दीर, नणंद दोघांनी केरोसीन ओतून महिलेला जिवंत जाळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना दीर आणि नणंद दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महिलेला आधी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाद नेमका काय झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.